आंबेडकरी बहुजन चळवळीचा आधारवड हरपला : यशवंत हिरु शिंदे (शिंदे सर) यांच्या दुःखद निधनाने शोककळा

आंबेडकरी, बहुजन चळवळीतील अभ्यासू व लढवय्या नेता हरपला, मान्यवरांची शोकाकुल प्रतिक्रिया

त्यांच्या निधनाने आंबेडकरी व बहुजन चळवळीवर शोककळा पसरली असून समाजाचा एक लढवय्या, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पच्छात चार मुले, सुना, नातवंडे, व मोठा परिवार आहे. शिंदे सर हे केवळ राजकीय किंवा सामाजिक पदांपुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्वसामान्यांच्या मनातील विश्वासाचे नाव होते. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांनी हजारो कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. कोणाच्याही सुखदुःखात ते आपुलकीने सहभागी होत असत. त्यामुळेच त्यांच्याविषयी समाजात विशेष आदर आणि आत्मीयता होती. संविधानिक मूल्ये जपत, लोकशाहीच्या बळकटी साठी ते अहोरात्र झटले.


बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, संघटन आणि प्रबोधन या माध्यमांतून त्यांनी समाजात परिवर्तनाची ज्योत पेटती ठेवली. समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने कार्य करत अनेकांना आधार दिला.
त्यांच्या निधनामुळे बहुजन, आंबेडकरी आणि सामाजिक चळवळीचे मोठे व अपूरणीय नुकसान झाले असून समाजमन हळहळले आहे. रायगड सह राज्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“माणूस म्हणून जगताना समाजासाठी झटणारा एक हृदयस्पर्शी नेता आज आपल्यात नाही,” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत यशवंत शिंदे यांचे जलदान विधी व शोकसभा रविवारी दि. 7 जून 2026 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह सिद्धार्थ नगर रोहा येथे ठीक 11 वाजता होणार असल्याची माहिती शिंदे कुटुंबियांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *