स्वच्छतेसाठी विहिरीच्या पाण्याचा वापर, दररोज 40 हजार लिटर पिण्याच्या पाण्याची बचत
संकेत पाटील /तासगाव
संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून तासगाव नगरपरिषदेने पाणी बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे शुद्ध पिण्याचे पाणी बंद करून त्याऐवजी विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.
दररोज 40 हजार लिटर पाण्याची बचत
या उपक्रमामुळे दररोज सुमारे 40 हजार लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. दुष्काळाची शक्यता लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. ‘आजची पाण्याची बचत म्हणजे उद्याच्या दुष्काळावर मात करण्याची तयारी’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा निर्णय आहे.
बारव विहिरीचे पुनर्जीवन
शिवनेरी कॉलनी परिसरातील नगरसेवक संदीप सावंत यांच्या घराजवळ असलेल्या पट्वेकर बारव विहिरीचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. या विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला असून, हेच पाणी आता सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते आणि इतर ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामासाठी खर्च होणाऱ्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
नागरिकांना दिलासा
या निर्णयामुळे शहरातील उपलब्ध पिण्याचे पाणी नागरिकांच्या वापरासाठी अधिक प्रमाणात राखून ठेवणे शक्य होणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत आणि शाश्वत विकासाचा उत्कृष्ट समन्वय साधणारा हा उपक्रम भविष्यातील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
उपस्थित मान्यवर
यावेळी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, नगराध्यक्षा विजयाताई पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, गटनेते सतीश लिंबळे, पाणीपुरवठा सभापती रोहिणीताई धोत्रे, नगरसेवक अनिल कुरे, संदीप सावंत, सचिन थार, भारतिताई धायगुडे, अर्चनाताई शिंदे, संध्या लुगडे, संतोष बेले, विशाल शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
तासगाव नगरपरिषदेचा हा उपक्रम इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
