गडचिरोली :
आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना अचानक उलटी आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना तातडीने गडचिरोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकूण ११ विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
आश्रमशाळांमध्ये दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवासाची सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय मदत याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेने महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय होते, विद्यार्थिनींना सर्पदंश नेमका कुठे आणि कशा परिस्थितीत झाला, तसेच आश्रमशाळेत सुरक्षा उपाययोजना पुरेशा होत्या का, याबाबत प्रशासनाच्या चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने यापूर्वी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश, आजारपण, अपघात आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास तातडीने प्राथमिक चौकशी करण्यासाठी आपत्कालीन आढावा यंत्रणा निश्चित केली आहे.
या घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून अधिक ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
