चिंचणीच्या तरुणांचा तालुक्यात डंका
एकाच वेळी आठ जणांची भरती, तालुक्यात अव्वल
संकेत पाटील /तासगाव
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने यंदाच्या भरतीमध्ये तालुक्यात डंका वाजवला आहे. एकाच वेळी आठ तरुण-तरुणींची विविध पोलीस दले आणि अग्निशमन दलात निवड झाली असून विशेष म्हणजे यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या मुला-मुलींनी सातत्याने मेहनत घेत, अपयशाला तोंड देत आणि स्वप्नांसाठी संघर्ष करत यश मिळवले आहे. तालुक्यात पूर्वीपासून असलेला डांबरट पणाचा शिक्का या तरुणांनी मोडीत काढला आहे.यातील काही तरुण गेले दहा, दहा वर्ष भरतीचा सराव करत होते. पण ते मागे हटले नाहीत.

1
विकास विश्वनाथ महाजन.
दहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यानंतर विकास पुणे शहर पोलिसात सामील झाला. अनेक वेळा अपयश आले तरी त्याने हार मानली नाही. कठीण परिस्थितीतही अभ्यास आणि शारीरिक तयारी सुरू ठेवून त्याने स्वप्न पूर्ण केले. आज गावातील मुलांसाठी तो प्रेरणास्थान बनला आहे.

2.
विजय मोहन पाटील
आठ वर्षे मेहनत घेतल्यानंतर विजय सांगली पोलिसात निवडला गेला. त्याचा भाऊ सध्या नवी मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. घरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या चिकाटीमुळे विजयने यश संपादन केले.

3.
शुभम जालिंदर माने
चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शुभम मुंबई पोलिसात दाखल झाला. साध्या परिस्थितीतही अभ्यास आणि शारीरिक क्षमता वाढवण्यावर त्याने भर दिला. त्याच्या यशाने गावातील तरुणांना नवी ऊर्जा मिळाली आहे.

4.
सोमनाथ अशोक शिंदे
पाच वर्षे प्रयत्न केल्यानंतर सोमनाथ अग्निशमन दलात फायरमन म्हणून निवडला गेला. कठीण परीक्षांना सामोरे जात आणि सातत्याने मेहनत घेत त्याने स्वप्न साकारले. त्याच्या यशाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

5.
चंद्रकांत धनाजी माने
आठ वर्षे सातत्याने प्रयत्न करून चंद्रकांत राज्य राखीव पोलीस दलात भरती झाला. अपयशाला तोंड देतही त्याने हार मानली नाही. त्याची मेहनत आणि धैर्य इतर युवकांसाठी उदाहरण आहे.

6.
रुचिता जालिंदर सावंत
तीन वर्षांच्या मेहनतीनंतर रुचिता मुंबई पोलिसात सामील झाली. गावातील मुलींसाठी ती एक प्रेरणादायी उदाहरण बनली आहे. तिच्या यशाने मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.

7.
स्नेहल चव्हाण
पहिल्याच भरतीत स्नेहल नवी मुंबई पोलिसात निवडली गेली. तिची मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास इतर मुलींसाठी मार्गदर्शक ठरला आहे. अल्पावधीत मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे.

8.
मृणाल ज्ञानदेव जाधव
दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर मृणाल मुंबई पोलिसात दाखल झाली. तिचा भाऊ मयूर जाधव मागील वर्षी पोलिसात भरती झाला होता. आता दोघे भाऊ-बहीण पोलिसात आहेत. हे यश त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद असून गावासाठीही गौरवाची बाब आहे.
या आठही तरुण-तरुणी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी दाखवलेली चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे. चिंचणी गावाने तालुक्यात अव्वल कामगिरी करून सर्वांचे कौतुक मिळवले आहे. गावातील रहिवाशांनी या तरुण-तरुणींचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
